Oct 28, 2018

मिसळ `मैफल`


मिसळ हा भराभर उरकण्याचा नाश्ता नाही, तर ती एक शास्त्रीय संगीताची बहारदार मैफल आहे.

मैफलीच्या आधी तिची जागा निश्चित करावी लागते, श्रोते कोण असणार, किती दर्दी असणार, याचा अंदाज घ्यावा लागतो.

मिसळीचंही तसंच आहे. `चला, आता शास्त्रीय संगीत मैफलीला जाऊ` असं म्हणून आपण उरकल्यासारखं मैफलीला जात नसतो. तसंच `चला, मिसळ खाऊ` म्हणून मिसळ खायला जायचं नसतं. मिसळ खाण्यासाठी बैठक लागते, पूर्वतयारी लागते. सुटीचा दिवस निश्चित करावा लागतो. सकाळपासून पोटात जागा ठेवावी लागते. किंबहुना, `उद्या मिसळ खायचेय,` हे कळल्यापासून जठराग्नीसुद्धा शांत होऊन कुठेतरी दडी मारून बसतो, कारण मिसळ समोर आल्यानंतर आपल्याला भडका उडवायचा आहे, याची त्याला कल्पना असते.

 

मिसळ खाण्यासाठीचं चांगलं ठिकाण आधीच शोधून ठेवायचं असतं. त्यासाठी गूगल मॅप्स, इंटरनेटची मदत होत नाही, तर केवळ चांगलं खाण्यासाठी जगणाऱ्या आपल्या मित्रमंडळींशी संपर्क साधावा लागतो. अतिप्रसिद्ध झालेली ठिकाणं सोडून फारशा तुडवल्या न गेलेल्या अनवट वाटा शोधाव्या लागतात. अशाच एखाद्या ठिकाणी आपली क्षुधाशांती करणारं ठिकाण अल्लाद सापडून जातं.

मिसळ म्हणून बटाट्याची भाजी, कांदापोहे, नायलॉन पोह्यांचा चिवडा आणि त्यात सांबारसदृश आमटी ढकलणाऱ्या हॉटेलांकडे फिरकणं म्हणजे महापाप. मुळात मिसळ हा वडासांबारपासून ते शेजवान राइसपर्यंत सबकुछ मिळणाऱ्या हॉटेलमध्ये खायचा पदार्थच नाही. तो फक्त मिसळच देणाऱ्या छोट्या टपऱ्या किंवा आडबाजूच्या अडचणीच्या ठिकाणांमध्ये खाल्ल्यावरच जास्त समाधान देणारा पदार्थ. मिसळीचा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे रस्सा. सोडा घालून शिजवलेल्या पांढऱ्या वाटाण्यापासून कुठल्याही पद्धतीने केलं जाणारं फुळूकपाणी हा खरंतर रस्सा नव्हेच. फक्त फरसाण घालून ज्याची चव अबाधित राहते, तो खरा रस्सा. मग तो मटकीचा असो, की काळ्या वाटाण्याचा, की हरभऱ्याचा.

प्लेटमध्ये फरसाण, कांदा घातल्यानंतर मोठ्या पातेल्यात रटरटणाऱ्या द्रवपदार्थावरचं तर्रीचं जाडजूड झाकण ओगराळ्यानं बाजूला केल्यानंतर खाली दिसणारा तांबूस पदार्थ म्हणजे रस्सा. तो रस्सा घालून आणि वर तर्रीचं मधाचं बोट लावून कांदा, शेव, कोथिंबीर घालून मिसळ आपल्यासमोर येते, तेव्हा तिच्या त्या मनमोहक रूपानं आपलं लक्ष वेधून घेतलं जायला हवं.

 

मूर्तिमंत सौंदर्याला जसं हिरे-पाचू-माणसांच्या आभूषणांची गरज लागत नाही ना, तसंच मिसळीलाही फक्त बारीक चिरलेला भरपूर कांदा, शेव आणि कोथिंबीर, एवढीच सजावट पुरेशी असते. जोडीला कांद्याची एक्स्ट्रा वाटी, लिंबाची फोड आणि शेजारी ठेवलेल्या बादलीतला वाफाळता रस्सा, असे कसलेले वादक असले, की पुरे.

 

मिसळीच्या वाडग्यात आधी रश्श्याची पहिली वाटी रिकामी करावी, वाटीतला निम्मा कांदा ओतावा आणि बादलीतला तेवढाच रस्सा पुन्हा ओतून घ्यावा आणि मगच मिसळीचा आस्वाद घ्यायला सुरुवात करावी.

मिसळीसाठीचं ठिकाण ठरवताना `जादा रस्सा हवा असल्यास सव्वाअकरा रुपये जास्त आकार लागेल` असले बोर्ड टांगलेल्या ठिकाणांना आधीच बाद करून टाकावे. किमान दोनदा फुकट रस्सा, तोही न मागता देणाऱ्या किंवा शेजारी (`घ्या! अंघोळ करा ह्याच्यात!` अशा थाटात) रश्श्याची बादलीच आणून ठेवणारी ठिकाणं हीच खरी मिसळप्रेमी रसिकांच्या भावनांची कदर करणारी माणसं.

 

मिसळीची भैरवी सुरू झाली, की ती संपत आल्याची चुटपुट लागली, तर ती खरी मिसळ! कधी एकदा संपते असं झालं किंवा शेजाऱ्याकडे सरकवावी लागली, तर ती नापास!

 

सगळ्यात महत्त्वाचं :

मिसळ आवडल्यानंतर त्याच धुंदीत राहावं. `ह्याच्यापेक्षा त्या अमक्या ठिकाणची जास्त चांगली असते` हे वाक्य उच्चारून जिभेची चव घालवू नये. मैफलीत गाणं आवडलं नाही, पण तबला आवडला, तानपुरा झकास होता, असं होऊ शकतं. मिसळीच्या मैफलीत दोनच पर्याय असतात – आवडली, किंवा आवडली नाही! मिसळीत आणि शास्त्रीय संगीत मैफलीत तफावत असेल, तर ती एवढीच!

 

-    अभिजित पेंढारकर.

Oct 15, 2018

मी टू

``आरती, काय गं, कुठे होतीस एवढे दिवस? अचानक गायब झालीस! काही फोन नाही, निरोप नाही!`` वीणा जराशी वैतागलीच होती.

``बाई अहो गावाला गेल्ते. कामं होती जरा शेतीची.``

``तुम्हा बायकांचं असंच आहे. हातातल्या कामांचं तुम्हाला देणंघेणंच नसतं. असं अचानक न कळवता निघून जातात का? किती पंचाईत झाली माझी, माहितेय?``

``ताई, अहो कामासाठीच गेल्ते ना! जाऊ द्या की आता. इसरा! किती बडबड कराल?``

``घ्या! वर मलाच ऐकव तू. माझी बडबड दिसतेय तुला, स्वतःचा निष्काळजीपणा नाही दिसत?``

``बरं ऱ्हायलं. तुम्हाला नसंल पटत, तर जाते मी. दुसरं काम बघेन!``

आरती वळून जायला निघाली.

``थांब आता!`` वीणा पटकन तिच्या मागे धावली. ``काय करणार? आम्हालाच गरज ना! ये उद्यापासून. की आजच येतेयंस?``

``तुम्ही सांगाल तसं.``

``बरं, मग आजच काम सुरू कर. मला जरा श्वास तरी घ्यायला मिळेल. गेले महिनाभर मीच करतेय सगळं. कंबरडं पार मोडलं धावपळ करून!`` वीणा बडबडत होती. ``बाबा चार दिवसांसाठी इथे आले होते, ते बाथरूममध्ये घसरून पडले. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेणं, गावाला नेऊन पोचवणं, आईकडे त्यांच्या औषधपाण्याची चौकशी, इथे मुलांचे डबे, माझी नोकरी, घरातली कामं... आणि नेमकी त्याच दिवसापासून तू गायब!`` वीणाचा सगळाच त्रागा आज आरतीवर निघाला.

``जाऊ दे, तुझ्याशी काय बोलत बसलेय?`` असं म्हणत वीणा बेडरूमकडे वळली. आत पडलेले कपडेही अजून आवरायचे होते.

``आणि अर्धा पगारही कापणारेय हं मी तुझा!`` वीणानं जाता जाता सुनावलं.

काहीच प्रतिक्रिया न देता आरती कामाला लागली.

 

 

वीणा आत गेली, तेव्हाच तिचा फोन वाजत होता. शेवटची रिंग होऊन फोन कट व्हायच्या आधीच तिनं फोन उचलला.

``हां, संजना, बोल गं!``

संजनाने काहीतरी महत्त्वाचं सांगायला फोन केला होता. वीणालाही ते ऐकून धक्का बसला होता. तिच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. आरतीनं घरात झाडलोट सुरू केली होती, पण वीणा अध्येमध्ये येरझारा घालत होती आणि काळजीतही वाटत होती, ते तिच्या लक्षात आलं होतं. अर्ध्या तासाने तिचा फोन संपला, तेव्हा आरतीनं तिच्याकडे काळजीने बघितलं.

``काय झालं बाई?``

``जरा ऑफिसमध्ये गडबड झालेय, तुला नाही समजणार.``

``सांगा की. तुम्ही काळजीत वाटला, म्हणून इचारलं.``

``अगं, तुझ्या लक्षात येण्यासारखा विषय नाहीये तो! तुला कशाला चौकशा?``

``तसं न्हाई, पण....म्हंजी, तुमचा आवाज बी बदलला होता, म्हणून...``

``ह्या बायकांना ना, नको त्या चौकशा!`` वीणा स्वतःशीच पुटपुटली, ``आत्ता मला विचारेल आणि नंतर गावभर जाऊन सांगेल!``

बडबड करत वीणा पुन्हा तिच्या कामाकडे वळणार होती, तेवढ्यात तिला जाणवलं, आरती तिच्याकडे बघत जागीच उभी आहे.

``अगं काय त्रास आहे तुझा? तुला समजायला हवंच आहे का?

आरतीच्या प्रतिक्रियेवरून वीणाला समजलं, की ही काही ऐकल्याशिवाय हटणार नाही. तिला आत्ता जास्त कटकट नको होती. आरतीला कसंतरी गप्प करावं म्हणून ती म्हणाली, ``मी टू` मूव्हमेंटबद्दल काही ऐकलंयंस का तू?``

``न्हाई बा. काय असतं ते?``

``बघ! म्हणूनच तुला सांगत होते ना, तुझ्याशी संबंधित विषय नाहीये ते! नको त्या गोष्टीत लक्ष कशाला घालायचं? तुला नुसती कामं टाळायला काहीतरी कारणं हवीत! जा...काम कर!``

``तरी पण सांगा की!``

आता मात्र वीणा वैतागली.

``अगं, ज्या बायकांना पुरुष त्रास देतात, त्यांचा छळ करतात, त्यांना मानसिक, शारीरिक त्रास होईल असं वागतात, त्यांनी आपल्यावरच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी... म्हणजे, आपल्याबाबतीत जे वाईट घडलंय ते सांगण्यासाठी एक चळवळ सुरू केलेय. त्याला `मी टू` असं नाव दिलंय.``

``असंय व्हय? म्हंजी मोर्चा बिर्चा हाय काय?``

``नाही गं, मोर्चा नाही, त्या सोशल मीडियावर लिहितात.``

``कुठं?``

``फेसबुकवर.``

``त्याच्यानं काय होतं?``

``त्यामुळे त्या लोकांचं खरं रूप बाकीच्यांना कळतं, पोलिस चौकशी करतात, इतर बायकांना त्यांच्यावरच्या अन्यायाबद्दल बोलावंसं वाटतं, काही वाईट लोकांचा खोटारडेपणा उघड होतो. कधीकधी पोलिस कारवाईही करतात.``

``असंय व्हय!``

``बघ, म्हटलं होतं ना, तुझा नाही संबंध, तर कशाला विचारतेयंस?``

आरती काहीच न बोलता तिच्या कामाला लागली. सगळं काम पूर्ण करून ती जायला निघाली.

``येते बरं का, ताई.``

``हो. उद्यापासून येणारेस ना नक्की?``

``व्हय.``

``नशीब!``

``ताई, बाबांची तब्येत कशी आहे आता?``

``ठीकेय. थोडा मुकामार होता. नशीब, काही फ्रॅक्चर वगैरे झालं नाही. नाहीतर या वयात पडल्यावर किती त्रास होतो, माहितेय ना..?``

``व्हय व्हय. बरं, येते.`` आरती निघून गेली.

...

 

 

``पण वेळच्यावेळी औषधं घ्या बरं का. दुर्लक्ष करू नका. आणि गरज वाटली, तर मला कळवा. मी येईन भेटायला!`` दुसऱ्या दिवशी सकाळी आरती कामावर आली, तेव्हा वीणा तिच्या वडिलांशी बोलत होती.

``एक मिनिट हं, बाबा!`` असं म्हणून वीणानं दार उघडली आणि आरतीला काय काम करायचंय, ते सांगितलं. पुन्हा फोनवर बोलायला लागली.

``अहो, ती आरती आली ना, तिच्याशी बोलत होते. आज महिन्यानंतर उगवलेय ती!`` वीणानं बाबांना सांगितलं.

``नाही, आज जरा लवकरच जाणारेय ऑफिसला. अहो, आमच्या बॉसच्या विरुद्ध एका कलीगनं तक्रार केलेय. त्यांनी तिचा छळ केल्याची. हो, त्यामुळे आज जरा खडाजंगी होणारेय ऑफिसमध्ये. नाही, आम्हाला तसा काही अनुभव नाही आलेला, पण पुरुषांचं काय सांगावं? एकूणच मी टू मोहिमेला सपोर्ट करायला हवा ना!`` वीणाला आणखी बरंच बोलायचं होतं, पण बाबांना अचानक आठवलं, की त्यांना दवाखान्यात जायचंय चेकअपसाठी. वीणानं फोन आटोपता घेतला.

ती बेडरूमकडे जायला वळली, तेव्हा तिला लक्षात आलं, की आरती हातात झाडू घेऊन दारातच उभी आहे.

``काय गं, तू अजून काम सुरूच केलं नाहीयेस?`` वीणा पुन्हा वैतागली.

``ताई, ते मी टू बद्दल कायतरी सांगत व्हतात नव्हं का तुम्ही काल... ?``

``झाली का तुझी सुरुवात? कशाला गं तुला नसत्या चौकशा?``

``सांगा की ताई. आत्ता बी बोलत व्हतात तुम्ही.``

``तुला काय हवंय नेमकं? आणि मुळात तुझा काय संबंध? तू का विचारतेयंस एवढं? अगं, मोठमोठ्या ऑफिसमध्ये, कंपन्यांमध्ये, कामाच्या ठिकाणी असले त्रास असतात. बॉस लोक त्यांच्या ऑफिसमधल्या बायकांना त्रास द्यायचा प्रयत्न करतात, त्यांचा गैरफायदा घ्यायला बघतात, कधीकधी सिनेमात किंवा नाटकात काम करणाऱ्या नट्यांच्या बाबतीतसुद्धा असं होतं. तू जा बाई आता..मलाही लवकर निघायचंय...वेळ नको घालवू.``

``ताई, पण कधीतरी असलं कायतरी झालेलं असंल, लई दिस उलटून गेले असतील, तरी बी तक्रार करता येते? म्हंजी, पोलिस ऐकून घेत्यात?``

``घ्यावंच लागतंय त्यांना! अनेक बायका तक्रार करतायंत, पोलिसांवर तेवढं दडपण आहे. त्यांनी दखल घेतली नाही, तर तेच अडचणीत येतील. सरकार तर कायदासुद्धा करणारेय या बाबतीत! `` वीणानं तिच्या सगळ्या शंका मिटवून टाकल्या. ``पण तू का एवढ्या चौकशी करतेयंस? तुझ्या माहितीत कुणाच्या बाबतीत काही....`` वीणाला आता आरतीच्या चेहऱ्यावरून जरा काळजी वाटायला लागली होती.

``म्हायतीत कशाला ताई? मी माझ्याबद्दल इचारत होते!``

``काय?`` वीणा उडालीच!

``अगं, मग सांगितलं का नाहीस? कुणी त्रास दिला तुला? तुझ्या शेजारचं कुणी? दीर? नात्यातलं जवळचं कुणी? की... ?``

``ताई, मला सांगा, आपण तक्रार दिल्यावर पोलिस त्या मानसाला पकडून तुरुंगात टाकतात व्हय?``

``म्हणजे काय! कधीकधी चांगलं धुतात कोठडीत. लहान-मोठं, वय बिय काही बघत नाहीत!``

``पण त्या मान्सानं आपल्या अंगावर कधीतरी हात टाकला असंल, आन् पोलिसांनी त्याला फटकावल्यावर त्याला बी त्रास झाला तर?``

``होऊ दे की! त्याच्या कृत्याची शिक्षा त्याला मिळायलाच हवी! आपण कशाला त्याच्या वयाचा विचार करायचा? त्यानं हे असले धंदे करताना केलेला असतो का विचार? मला सांग, तू असं आडून आडून का बोलतेयंस? तू काहीतरी सांगत होतीस, ते सांग की! घाबरू नको! मी आहे तुझ्या पाठीशी!`` वीणाला आता आरतीबद्दल पूर्ण सहानुभूती वाटत होती. आरतीसाठी काहीही करायचं तिनं ठरवलं होतं.

``न्हाई...मी आपलं सहजच इचारत होते. तसलं काय न्हाई झालेलं माझ्यासंगट.!``

``नक्की ना?``

``व्हय.``

वीणानं मोकळा श्वास घेतला. आरतीसुद्धा दोन क्षण तिथेच रेंगाळली.

``ताई, बाबांची तब्येत कशी आहे आता?`` तिनं विचारलं.

``ठीकेय. होतायंत हळूहळू बरे. बाथरूममध्ये पडले तेव्हा जरा मार लागला होता, पण नशीबानं फार मोठं काही नाहीये. नशीबच म्हणायचं!``


 

-    अभिजित पेंढारकर.

बेरंग

दाराची कडीसुद्धा वाजणार नाही, याची काळजी घेत ती दबक्या पावलांनी घराबाहेर पडली.

तिला प्रचंड धाकधूक वाटत होती. कुणी आपल्याला बघणार तर नाही ना, कुणी आपल्याला काही बोलणार तर नाही ना, याची काळजी होती. सुदैवानं शेजारीपाजारी आपल्या कामात गुंतले होते. दोन घरं पलीकडे राहणारी नीलिमा खिडकीपाशीच होती, पण आभाळात कुठेतरी नजर लावून बसली होती.

लिफ्टचं बटण दाबून ती लिफ्ट येण्याची वाट बघत बसली. सकाळच्या वेळी लिफ्टमध्ये कुणी ना कुणी असणारच! त्यांनी काही विचारलं तर? तिला काळजी वाटली.

आज तिला कुणाचीच नजर नकोशी झाली होती.

काही क्षणांत लिफ्ट आली. सहाव्या मजल्यावरून खाली जायचं म्हणजे मध्ये कुणी ना कुणी लिफ्ट थांबवणार, आपल्याला बघितल्यावर काहीतरी चौकशी करणार...!

जिन्यानं जावं का?

तिनं दोन क्षण विचार केला. लिफ्टचं दार उघडलं.

``please close the door!`` लिफ्टसुंदरी बोंबलू लागली.

तिनं मनाचा हिय्या केला. काय होईल ते होवो, लिफ्टनंच जायचं! तिनं लिफ्टमध्ये पाऊल ठेवलं आणि ग्राउंड फ्लोअरचं बटण दाबलं. सहा मजले उतरून जातानाचे 15-20 सेकंद तिला युगांसारखे भासत होते.

तिच्या सुदैवानं मधल्या मजल्यांवरच्या कुणीही लिफ्टचं बटण दाबलं नाही. ती ग्राउंड फ्लोअरवर पोहोचली. इथे तरी नक्कीच कुणीतरी समोर भेटणार, अशी सार्थ भीती तिला वाटली. पण सुदैवानं तळमजल्यावरही कुणीही नव्हतं. तिनं तसाच घाईघाईत स्कार्फ गुंडाळला आणि ती बाइकवर बसून भुर्रर्रर्र करून निघाली. आज तिनं खालच्या निर्मलाकाकूंना काही सांगितलं नाही, की सोसायटीबाहेरच्या दुकानदार काकांना बाय केलं नाही, की वाटेतल्या देवळात दर्शन घ्यायला ती थांबली नाही.

तिच्या मनातली भीती अजूनही कमी झाली नव्हती. नेमकं वाटेत कुणीतरी ओळखीचं भेटेल की काय, अशी धाकधूक होती. 45 सेकंदांच्या सिग्नलसाठी चौकात थांबतानाही ती अस्वस्थ होती. तिच्या नशीबानं तिचा ऑफिसपर्यंतचा प्रवासही सुखरूप पार पडला.

या ऑफिसमध्ये ती नव्यानेच जॉइन झाली होती. स्टाफ कमी होता आणि सगळ्यांशी नीट ओळखीही झाल्या नव्हत्या. प्रत्येकाचे स्वभाव, सवयी, त्यांच्या आवडीनिवडी, सणवार साजरे करण्याची पद्धत, याबद्दल तिला फारशी कल्पना नव्हती.

आज घरातून बाहेर पडण्यापासून ऑफिसमध्ये पोहोचेपर्यंत तिच्या मनात जी भीती होती, त्यामागेही हेच कारण होतं.

तिच्या नशीबाने तिला आज या प्रवासात कुणी टोकलं नव्हतं. कुणी ओळखीचं भेटलं नव्हतं, कुणी हिणवलं नव्हतं, कुणी काही कमेंट केली नव्हती.

 

ती धावतपळत ऑफिसमध्ये पोहोचली.

एकदा ऑफिसमध्ये पोहोचल्यावर तिच्या मनातली भीती पूर्णपणे संपणार होती. तिला हायसं वाटणार होतं. एवढी पायरी ओलांडली की झालं, असं तिला वाटलं!

तिची धाकधूक आता अगदी शेवटच्या स्टेजला होती.

तिनं ऑफिसच्या दारात पाय ठेवलं मात्र...

ऑफिसमध्ये नव्यानंच जॉइन झालेल्या रिसेप्शनिस्टनं विचारलेल्या प्रश्नानं तिच्या सकाळपासूनच्या मेहनतीवर पाणी फेरलं गेलं. रिसेप्शनिस्ट म्हणाली, ``काय मॅडम, आजचा रंग निळा आहे, माहिती नाही होय तुम्हाला?``

 

-    अभिजित पेंढारकर.

Sep 2, 2018

केल्याने भाषांतर

रत्नागिरीत पत्रकारितेला सुरुवात केली, तेव्हा तिथल्या `रत्नागिरी एक्स्प्रेस` या स्थानिक दैनिकात अनिल जोशी या सहकाऱ्याकडे भाषांतराची जबाबदारी असायची. टेलिप्रिंटर अखंड खडखडत असायचा आणि त्याच्यावरच्या इंग्रजीतल्या कॉपीज टराटरा फाडून तो ते भेंडोळं समोर घेऊन बसायचा. एकट्यानं बहुतेकसं भाषांतर बडवायचा. ते पहिल्यांदा बघितलं, तेव्हा खूप भारी वाटलं होतं.

 

तिथे भाषांतर करण्याची फार वेळ आली नव्हती. `सागर` आणि `सकाळ`मध्ये तर मी बातमीदारीच करत होतो. भाषांतराशी संबंध येण्याचा प्रश्न नव्हता.

 

पुण्यात आल्यानंतर आधी `लोकसत्ता`त बातमीदारी करून `केसरी`मध्ये नोकरीला लागलो, तेव्हा बातम्यांच्या भाषांतराशी थेट आणि जवळचा संबंध आला. अभय कुलकर्णी, अमित गोळवलकर, विनायक ढेरे हे सिनिअर तेव्हा बातम्या भाषांतरित करायला द्यायचे. प्रत्येक बातमीचं शब्दन् शब्द भाषांतर झालंच पाहिजे, असा सुरुवातीला माझा समज होता. तीन-चार पानांच्या इंग्रजी बातमीची सुरेंद्र पाटसकरसारखे सहकारी एखाद-दुसऱ्या परिच्छेदात वासलात लावायचे, तेव्हा आश्चर्य वाटायचं. नंतर मीसुद्धा भाषांतराचं (आणि कापाकापीचं) तंत्र शिकू लागलो आणि त्यात मजा वाटायला लागली. दडपण कमी झालं.

 

पीटीआय, यूएनआयच्या बातम्यांमधल्या विशिष्ट शब्दांची परिभाषाही समजली. Wee hours, Charred to death, slammed, thrashed, alleged, sacked, to get a shot in arms, whip, अशा शब्दांची गंमत कळायला लागली. पीटीआयच्या विशिष्ट बातम्यांमध्ये विशिष्ट शब्द असायचेच.

 

Air Strikes चं `वैमानिकांचा संप` अशा झालेल्या चुकीच्या भाषांतरांची उदाहरणं ऐकली, वाचली होती, तरी काम करताना भरपूर चुकाही घडायच्या. रत्नागिरीत असताना आंतरराष्ट्रीय घडामोडी वाचायची कधी सवय नव्हती. बातमीमध्ये Shanghai has said, Islamabad has said अशी वाक्यं असली, की गोंधळ व्हायचा. म्हणजे `चीनने/पाकिस्तानने म्हटले आहे,` हा अर्थ हळूहळू समजायला लागला.

Sanctions on Iraq म्हणजे इराकवर बंधनं किंवा परवानगी नव्हे, तर `निर्बंध` असे विशिष्ट वर्तमानपत्रीय पारिभाषिक शब्दही समजायला लागले.

 

संपादक अरविंद गोखले दर मंगळवारी मीटिंग घ्यायचे आणि अंकातील चुका सांगायचे. चूक कुणाची आहे, ते त्या त्या व्यक्तीनं आपणहून समजून घ्यायचं, अशी पद्धत होती. चूक केलेल्या व्यक्तीचा उल्लेख किंवा जाहीर पंचनामा व्हायचा नाही. एकदा मी `Pentagon said`चं `पेंटॅगॉन` या नियतकालिकात असे म्हटले आहे की,` असं भाषांतर करून ठेवलं होतं. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाला Pentagon म्हणतात, हे तेव्हा समजलं.

 

`सकाळ`मध्ये आल्यानंतर तर बहुतांश काम भाषांतराचंच असायचं. अशोक रानडे, विजय साळुंके यांच्यासारखे कसलेले पत्रकार आमच्या बातम्या तपासायचे. साळुंके तर आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक. ते मुद्दाम आंतरराष्ट्रीय बातम्या भाषांतरित करायला द्यायचे आणि त्या त्या विषयांचा अभ्यास करावा लागायचा.

 

`सकाळ`मध्ये नेमके आणि योग्य मराठी शब्द वापरण्याबद्दल त्यांचा अतिशय आग्रह असायचा. Line of control (LOC)ला तेव्हा `सकाळ`मध्ये `प्रत्यक्ष ताबारेषा` असा शब्द त्यांनी रूढ केला होता. नियंत्रण आणि `ताबा` यात म्हटलं तर फरक आहेच. नेमकेपणा राखला जायचा, तो असा.

 

`सकाळ`चे माजी संपादक एस. के. कुलकर्णी अधूनमधून शिकवायला यायचे. ते म्हणजे तर शब्द, भाषा, ग्रामीण महाराष्ट्र, यांचे गाढे अभ्यासक. इंग्रजीत feared dead हा वाक्प्रचार वापरतात. त्याचं मराठी शब्दशः भाषांतर `ते मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे,` असं केलं जातं, त्याला त्यांचा आक्षेप असायचा. आपल्याला भीती कशाला वाटेल? `मृत्युमुखी पडल्याची शक्यता` असू शकते, असं ते म्हणायचे.

 

Milestone म्हणजे `मैलाचा दगड` नाही, `महत्त्वाचा टप्पा` हेसुद्धा तिथेच शिकता आलं.

कधीकधी मंगळवारच्या मीटिंगमध्ये ज्येष्ठ पत्रकार गोपाळराव पटवर्धन यायचे. तेसुद्धा इंग्रजीचे मोठे अभ्यासक. एकदा मी ब्यूटी क्वीन स्पर्धेच्या बातमीत blonde हे नाव समजून `ब्लॉंड अमूक तमूक` असं भाषांतर केलं होतं. त्यांनी त्याबद्दल मीटिंगमध्ये सांगितल्यानंतर मला चूक लक्षात आली.

 

 

नंतर भाषांतराची गोडीच लागली. इंटरनेट आल्यानंतर हे काम आणखी रंजक झालं. मूळ पीटीआयची बातमी वाचायची, यूएनआयच्या बातमीशी ती ताडून बघायची, मग इंटरनेटवर त्याचे आणखी तपशील शोधायचे, इतर वेबसाइट्सच्या बातम्या बघायच्या आणि हे सगळं वाचून एकत्रित दीडशे किंवा दोनशे शब्दांची बातमी करायची, त्यात एखादी चौकट तयार करायची, याची मजा वाटायला लागली. एखाद्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य किंवा कोर्टाचा निकाल अशा बातम्यांचं भाषांतर जास्त इंटरेस्टिंग असायचं. त्यात शब्दांचे अर्थ, छुपे अर्थ शोधता यायचे, त्या व्यक्तीची समज, तिची प्रतिमा, यांचा आधार घेऊन भाषांतर करावं लागायचं. शशी थरूर यांचं इंग्रजी, लालूप्रसाद यादव किंवा उत्तरेतल्या काही नेत्यांचं हिंदी, त्यातले वाक्प्रचार समजून घेऊन नेमकं भाषांतर करण्याची फार हौस असायची. आर्थिक बातम्यांच्या मात्र मी फारसा फंदात पडत नसे.

 

आशियाई देशांना सुनामीचा फटका बसला, तेव्हा पहिले दोन दिवस नुकसान, मृत्यूच्या आकड्यांच्या बातम्या दिल्यानंतर बातम्यांमध्ये तोच तोचपणा येऊ लागला होता. रोज मुख्य बातमी तर करायला हवी, पण आकडेवारीशिवाय वेगळं काही नाही, अशी परिस्थिती होती. चौथ्या दिवशी तेव्हाचे संपादक अनंत दीक्षित यांनी सांगितलं, त्याच विषयाची काहीतरी वेगळी बातमी शोधून काढा आणि ती पहिल्या पानावरची मुख्य बातमी (मेन फीचर) करा. आमची शोधाशोध सुरू झाली. प्रदीप कुलकर्णी आणि मी, असे दोघे सहकारी रात्रपाळीला होतो. एका बातमीत एक-दोन ओळींमध्ये काही नागरिक आता आपल्या जुन्या घरांमध्ये परतू लागले असून, पुरातून वाचलेलं सामान गोळा करण्याचा प्रयत्न करतायंत, असा काहीतरी उल्लेख होता. मला मुख्य बातमी मिळाली होती.

 

मग त्या दोन-तीन ओळींवरून, तिथल्या परिस्थितीची कल्पना करून सुमारे तीनशे साडेतीनशे शब्दांची, तिथल्या परिस्थितीचं वर्णन करणारी, भावनिक बातमी लिहिली. कुणी घर सावरण्याचा प्रयत्न केला असेल, कुणी आपल्या हरवलेल्या मुलांचा शोध घेतला असेल, कुणी आपले दागदागिने शोधत असेल, अशी सगळी कल्पना करून बातमी लिहिली होती. दुसऱ्या दिवशी तिची खूप प्रशंसा झाली. भाषांतराच्या काळातला तो सगळ्यात गोड आणि आनंददायी अनुभव.


सावल्या


लहानपणी सुट्या लागल्यावर आजोळी शिपोशीत राहायला जायचो. तीन मामेभावंडं आणि मी, असा दंगा असायचा. कधी गुरं राखणं, कधी नदीवर आंघोळ, कधी आंब्याच्या बागेत धुडगूस तर कधी पत्त्यांचा डाव, असे उद्योग चालायचे. संध्याकाळी कधीकधी नदीच्या एका बाजूला, थोड्या आडजागी आम्ही वाळूत खेळायला जायचो. उन्हाळ्यात नदी बऱ्यापैकी आटलेलीच असायची, पण ती ओलांडून जावं लागायचं. तो भाग तसा आडोशाचा होता आणि तिथे आसपास फारशी वस्ती नव्हती. तिथे खेळायला आम्ही जरा लवकर जायचो आणि सहा वाजेपर्यंत अंधार पडायच्या आत घराची वाट धरायचो. संध्याकाळच्या वेळी तिथली हलणारी झाडं, त्यांतून घुमणाऱ्या वाऱ्याचा आवाज, त्यांच्या सावल्या, सगळं गूढ वाटायचं. मामा कधीतरी रात्रीच्या वेळी त्याच्या वाडवडिलांनी, काकांनी, गावातल्या कुणीतरी पाहिलेल्या भुतांच्या कहाण्या सांगायचा. तिथल्याच कुठल्यातरी वडाखाली गावातल्या एकाला भुतानं झपाटलं होतं वगैरे कहाण्या ऐकून आम्ही टरकायचो. आम्ही नदीच्या बाजूला जायचो, तिथेच पुढच्या वाटेवर कुठेतरी ती घटना झाली असावी, असं वाटायचं.

 

 

मामाचं घर अगदी जुन्या पद्धतीचं होतं. ओटी, पडवी, माजघर, स्वयंपाकघर, परसदार, अंगण वगैरे. आम्ही सगळे माजघरात झोपायचो. बाहेर ओटी, पडवी, अशा दोन खोल्या होत्या. पडवीत आम्ही संध्याकाळी झोपाळ्यावर शुभंकरोति वगैरे म्हणायला बसायचो, पण लाकडी खिडकीच्या गजांतून कुणीतरी डोकावून बघतंय की काय, असे भास सतत होत असायचे. एकदा सात-सव्वासातच्या दरम्यान शुभंकरोति आटोपली, की मग पुन्हा पडवीत फिरकायची आमची शामत नसायची. जो काही धुमाकूळ घालायचा, तो माजघरात.

 

घरापासून दुसरं जवळचं घर किमान 50-60 फुटांवर होतं. बाहेर किर्रर्र काळोख आणि रातकिड्यांची किरकीर. रात्रीच्या वेळी भीतिदायकच वातावरण असायचं. घरात मिळमिणते दिवे असायचे. त्यांच्या प्रकाशामळे भिंतींच्या, खांबांच्या, घरात रचून ठेवलेल्या पोत्यांच्या ज्या सावल्या पडायच्या, त्यांच्यामुळे त्या गूढ वातावरणात आणखी भर पडायची. रात्री माजघरातून कुणी बाहेरच्या खोलीचं दार बंद आहे की नाही, हे बघायला जायला सांगितलं, तर कुणीही त्या धाडसासाठी तयार नसायचं. कधीकधी आमच्या पैजाही लागायच्या. ओटीवर जायचं, ओटी पार करून दिवा लावायचा, मग पडवीच्या पायऱ्या उतरून जायचं, दार बंद आहे की नाही बघायचं, कडी घालायची आणि ओटीवर येऊन दिवा बंद करायचा, मग अंधारातच ओटी पार करून माजघरात यायचं, एवढं मोठं दिव्य असायचं ते. बाहेरच्या दाराला कडी घातली किंवा तपासली, की तिथून पाठमोरं परत येताना अंगातलं त्राणच गेल्यासारखं व्हायचं. सावकाश चालत यायचं टास्क दिलेलं असलं, तरी तेवढी हिंमतच नसायची. एकदा कडी घातली, की सुसाट पळत येऊन माजघर गाठायचं, हीच सर्वसाधारण रीत होती. एक क्षण थांबलो, तरी मागून एखादा हात येऊन आपली बकोट धरेल, असंच वाटायचं. दिव्यामुळे पडणाऱ्या स्वतःच्या सावलीचीही भीती वाटायची.

 

हळूहळू मोठे झालो आणि ही भीती कमी झाली आणि आजोळी जाणंही.

 

कधीकधी वाटतं, की बालपणी तेवढीच एक भीती होती, ते बरं तरी होतं. आता वेगवेगळ्या सावल्या रोजच भीती घालत असतात. त्यांच्यापासून कसं वाचणार?